Friday, April 22, 2016

सर्वोच्च न्यायालयाचा धार्मिक स्थळांना झटका.

सुप्रीम कोर्टात तिरुअनंतपुरमच्या के प्रदीपकुमार यांनी केलेल्या अर्जावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांचे कान पकडत, रस्त्यारस्त्यांवर वाहतुकीस अडथळे ठरणारी किंवा अनधिकृत अशी जमीन घशात घालण्याच्या उद्देशाने काढलेली देवळे-प्रार्थनास्थळे काढून टाकणे, पुन्हा उभी राहू नयेत यासाठी कारवाई करणे यावर एक अहवाल तातडीने द्यायला सांगितले आहे. रस्त्यावर सर्वांचा हक्क असून कोणत्याही धार्मिक कारणांमागे दडवलेल्या राजकीय हेतूंनी बांधलेली स्थळे नष्ट झाली पाहिजेत असे सर्वोच्च न्यायालयाने निसंदिग्ध शब्दांत सांगितले आहे.
सर्व शहरांत, छोट्या-मोठ्या नव्याने पसरणाऱ्या नगरांत अनधिकृत बांधकामांचा प्रश्न असतोच. त्यातही धार्मिक आधार घेऊन उघडलेल्या या देऊळ-मशीद-चर्च- गुरुद्वारा- विहार यांच्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्न अधिक अडचणीचा होतो. ती पाडायची तर त्या मागे बहुतेकवेळा उभ्या असलेल्या राजकीय- गुंड शक्ती त्याचा गैर फायदा घेऊन भलतीच नौटंकी उभी करतात. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचे  खरे आणि खोटे भय दाखवून या भूछत्री स्थळांची मशागत होत रहाते.
गेली काही वर्षे तर देऊळ काढणे हा व्यवस्थित धंदा म्हणून रुळलाय.
काही वर्षांपूर्वी आताचा मुंबईचा एक मिनिगोल्डमॅन जेव्हा केवळ गुंडगिरीत होता तेव्हा त्याने सभ्यतेची सफारी वस्त्रे चढवण्याचा राजमार्ग म्हणून जे काही केले ते तो फुशारकीने सांगत होता ते आठवले.
'आता सगळे जुने धंदे सोडले, साहेब. आता आपलं एक हॉटेल आहे बारकं. तिथं बार सुरू होईल लायसेन मिळाला की. आणि दोन देवळं आहेत आपली. मस्त चाललंय. आता जुना धंदा करायची गरज पडत नाय.'
कित्येक देवळं मी गेल्या चाळीस वर्षांत नजरेसमोर अस्ताव्यस्त वाढत जाताना, महिमा पध्दतशीरपणे वाढवत जाताना पाहिली आहेत.
उंबराच्या बुंधाशी असलेला लाकडी मखरातली दत्ताची तसबीर एका संगमरवरी मूर्तीवाल्या, ग्रेनाईटयुक्त देवळात बदलली.
सिध्दीविनायकचे अगदी बारीकसे देऊळ कसकसे फुगत गेले, सोन्याच्या कळसावर भ्रष्टाचाराचा कळस चढवते झाले, हातपाय रस्त्यात पसरणारा रांगमंडप आला, कोर्टातून त्यावर आक्षेप घेणारांना कसे नामोहरम करण्यात आले... हेही पाहिले. कोर्टाने देवळाच्या बाजूने निकाल दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्ती नसलेले नागरिक गप्प बसले होते.
झोपडपट्टी आणि हायवे याच्या मार्जिनमधे वाढलेली अनेक मंदिरे आहेत. बारीकशा देवळ्या सुजतसुजत सर्वांगी पसरतात. त्यात कुणाकुणाची सोय...  सगळं यथास्थित जमून येऊ लागतं. पन्नास-शंभर फुटाचे भिकार बांधकाम वाढतवाढत  दोन हजार स्क्वेअर फुटाच्या घरात जाते. लोकल फुडारी 'सदर खुले सभामंडपचे' काम करून देतात. मग कधीतरी खुले सभामंडप हळूच बंदिस्त होतात. देवळाच्या मागच्या बाजूने कळसाला लागून एक मजला चढवला जातो. सिंटेक्सची टाकी आणि लोखंडी जिना लागतो.  पुजाऱ्यांच्या जगण्याहागण्याची सोय होते. यच्चयावत सर्व सणांच्या दिवशी सजावट, रोषणाई, लाउडस्पीकरवरील आऱत्या भक्तीगीते यांच्या निमित्ताने चंदा जमा होत रहातो.
हायवे रुंदीकरणासारख्या कामातही या लबाड देऊळशाहीची आडकाठी होते. बाकी कष्टकऱ्यांच्या अनधिकृत झोपड्या उडवल्या जातात सहज. आणि ढेरपोट्या देवांच्या नि पुजाऱ्यांच्या काव्यांपुढे प्रशासने नांग्या टाकतात.
या प्रकाराला आवर घालण्याइतकी शक्ती सर्वोच्च न्यायालयाने आता प्रशासकीय, शासकीय संस्थांना प्रदान केली आहे.
पण इच्छाशक्तीचे देऊळ कोण बांधणार हो?

Saturday, April 16, 2016

मंदिरप्रवेशाच्या आग्रहाची बौध्दिक दिवाळखोरी.

नास्तिकांच्या दृष्टीने मंदिर प्रवेशाचा संघर्ष हा हास्यास्पदच होता आणि असेल. समाजात एका विशिष्ट बाबीवरून जाणीवजागृती करायची म्हणून एक प्रश्न उचलून लावून धरायची क्लृप्ती अनेक विचारसरणींतून केली जाते. तशीच कदाचित् स्त्रीवादी भूमाता ब्रिगेडने ती केली असेल. पण या संघर्षातून नेमके काय हाती लागले याचा विचार करताना, समाजातील एक श्रध्दा अधिकच गडद करण्याचेच काम यातून साध्य झाले हे काही वर्षांनंतर लक्षात येईल. अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या हमीद दाभोलकरांनी मंदिरप्रवेशाच्या संघर्षात अंनिसला उतरवायचे ठरवले आहे ही आणखी एक दुर्दैवी गोष्ट असेच मी मानते.
ज्या गोष्टी फेकूनच देण्याच्या लायकीच्या आहेत- म्हणजे शनी हा ग्रह असून देव नाही, शनीची ग्रहबाधा, मंगळाची बाधा या सर्व गोष्टी मूर्खपणाच्या आहेत हे सांगायचे काम विवेकवादाच्या पायावर उभ्या असलेल्या कुठल्याही चळवळीचे आहे. भूमाता ब्रिगेडचा पाया विवेकवादाविना असलेल्या स्त्रीवादाचा (अगदीच वाईट संगदोष) असेल तर त्यापासून दूर रहाणेच अंनिसला श्रेयस्कर राहिले असते. परंतु भूब्रिला मिळालेल्या प्रसिध्दीचा सोस अंनिसला पडला की काय असा प्रश्न मनात आल्यावाचून रहात नाही.
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंना या संघर्षावरून जी मारपीट झाली, त्यांचे चारित्र्यहनन किंवा त्यांची रेवडी उडवण्याचे जे प्रकार झाले त्या विकृत मानसिकतेचा निषेध सर्वांनीच केला पाहिजे. नास्तिकांनाही केला पाहिजे, आणि अंधश्रध्देविरुध्द थोडा लोकानुनय करत काम करण्याचे धोरण ठरवलेल्या अंनिसनेही केला पाहिजे. पण मंदिरप्रवेशाच्या आग्रहात उतरणे यातून मूळ विवेकवादाच्या भूमिकेला तडेच जातात.
या विषयावर मी आजवर काहीही लिहिले बोलले नव्हते, कारण ज्या भूमिका वेगळ्याच आहेत त्या प्रत्येक भूमिकेवर आपण लिहायलाच हवे असे काही नाही असे मला वाटते. परंतु अंनिसच्या नव्या भूमिकेमुळे नास्तिकवादातून आलेली भूमिका स्पष्ट व्हायला हवी असे वाटते.
मंदिरप्रवेशासाठी आंदोलनात उतरण्याच्या भूमिकेबद्दल मी अंनिसचा निषेध करीत आहे, कारण त्यात मला केवळ प्रसिध्दीच्या सोसाचा वास येतो आहे.


Tuesday, April 5, 2016

नासदीय सूक्त

नासदीय सूक्त म्हणजे बिगबॅन्ग सिध्दांताच्या जवळ जाणारी रचना आहे एवढेच नव्हे तर तसा अभ्यासच आपल्या पूर्वजांनी केला होता असे अतिशयोक्त दावे करायला मजाच येते परंपरावादी विद्वानांना.
नासदीय सूक्त अज्ञेयवादी विचाराची सुरुवात आहे. म्हणजे आस्तिक्याकडे झुकणारा अज्ञेयवाद आहे तो. नास्तिक्याकडे झुकणारा नाही. फार सुंदर कल्पना केली आहे. यातून एक सुंदर प्रतिभावान विचार समोर आला आहे हे नक्की. बिग बॅन्ग चे भौतिकशास्त्रवंत ज्ञान वेगळे.
                पण नासदीय सूक्त नक्की काय म्हणते ते जाणून घ्यायला हरकत नाही. मानवी जिज्ञासेतून स्फुरलेलं एक श्रेष्ठ काव्य आहे ते.



नासदासीन्नो सदासीत् तदानी
नासिद्रजो नो व्योमा परोयत् 
किमावरीवः कुह कस्य शर्मन्
अम्भ किमासीत् गहनम् गभीरम् .१
हे सारे निरस्तित्व नव्हते आणि अस्तित्वातही नव्हते. नव्हते वातावरण, नव्हते त्यापलिकडले आकाश. कशाने कशावर आवरण घातले होते? कोणी कुणाला आधार दिला होता? सारे जलमय होते कां... खोल खोल अथांग जल... होते कां ते तरी?

न मृत्यूरासीदमृतं न तर्हि
न रात्र्या अह्न आसीत् प्रकेतः.
आनीदवातं स्वधया तदेकं
तस्माद्धान्यं न परः किंच नास .२.
मृत्यूचे अस्तित्व नव्हते आणि अमर असेही काही नव्हते. रात्र आणि दिवसाचा भेद जाणव देणारे काहीही नव्हते. स्वतःच स्वतःचा श्वास बनलेले की श्वासरहित असे ते एक अस्तित्व... त्यापेक्षा वेगळे असे काहीच तर नव्हते तेव्हा.

तमआसीत्तमसा गूळ्ह
-मग्रेsप्रकेतं सलिलं सर्वमा इदम्
तुच्छ्येनाभ्वपिहितं यदासीत्
तमसास्तमहिनाजायतैकम् .३.
अंधःकार होता... सारा अनियंत्रित गोंधळ अंधःकारानेच पोटात घातलेला. जे जे काही होते ते नव्हतेही, निराकार होते... उष्ण शक्तीतून, अंधःकाराच्या अस्तातून ते काही एकमात्र जन्माला आले.

कामस्तदग्रे समवर्तताधि
मनसो रेतः प्रथमं यदासीत्
सतो बन्धुमसति निरविन्दन्
हृदि प्रतीष्या कवयो मनीषा .४.
आणि मग उद्भवली आरंभीची कामना... आत्म्याचे परम बीज, सूक्ष्म प्राण अशी ती कामना. नंतरच्या विचारवंतांनी आपल्या हृदयातून विचार करून निरस्तित्वाशी अस्तित्वाचे नाते शोधून पाहिले.

तिरश्चीनो विततो रश्मिरेषाम्
अधः स्विदासीदुपरी स्विदासीत्
रेतोधा आसन् महिमान आसन्
स्वधा अवस्तात प्रयतिः परस्तात .५.
त्यावेळी त्या दोघांमधील अंतर मिटत जाताना, त्या वरील अवकाशात काय होते आणि त्याखालील अवकाशात काय होते? तेथे सर्जक होते, महाशक्ती होत्या, मुक्तपणे काहीकाही घडत होते आणि ऊर्जेचा कल्लोळ होता

को अद्धा वेद क इह प्रवोचत्
कुत आजाता कुत इयं विसृष्टिः
अर्वाग् देवा अस्य विसर्जनेना-
sथा को वेद यत आबभूव .६.
ते जे घडत होते, जन्माला येत होते, निर्माण होत होते, त्याचा उगम कोणता, उद्भव कसा झाला, हे कोण निश्चितपणे सांगू शकेल? ही सृष्टी निर्माण झाल्यानंतर देवांची निर्मिती झाली. मग प्रथम कोण अस्तित्वात आले होते हे कोण जाणत असेल?

इयं विसृष्टिर्यत आबभूव
यदि वा दधे यदि वा न
यो अस्याध्यक्षः परमे व्योमन्
सो अङ्ग वेद यदि वा न वेद.७.
या निर्मितीचा मुळारंभ जो होता... त्यानेच या साऱ्याला आकार दिला- की नाही दिला? या सृष्टीवर सर्वोच्च स्वर्लोकीच्या कुणा दृष्टीचे नियंत्रण आहे? आहे कां? त्याला तरी हे सारे निश्चितपणे कळत असेल की नसेल...?


हा अनुवाद पूर्वीच कधीतरी करून ठेवलेला... 

आस्तिकांनी डोक्यावर घेतलेले आणखी एक चेटूक

रामदेव बाबा! गेल्या दोन दशकांत हा 'बाबायोगा' दरवर्षी मोठामोठा होत गेला. मास स्केलवर योगासनांची शिबिरे भरवण्याचा त्याचा उद्योग सुरू झाला तो साधरणतः १९९५-९६ च्या सुमारास. आणि मग त्याच्या प्रभावी भाषणशैलीचे व्यापारी सौष्ठव ओळखून त्याला काही व्यावसायिकांनी उचलून धरले. सन २००३ मधे बाबा रामदेव टीव्हीवर झळकू लागला. पहाटेच सुरू होणाऱ्या तथाकथित अध्यात्मिक चॅनेल्सच्या रांगेतल्या आस्था चॅनेलमधे याचीही भर पडली.
टीव्हीवरच्या किंवा कुठल्याही चकाकत्या पडद्यावरील माणसांच्या दर्शनाने भारतीय लोक कसे खुळावतात याची उदाहरणे अगणित आहेत. रामदेव बाबाचा योग, संस्कृती, ‘भ्रस्टाचार’ विरोध, नीती, आरोग्यदात्याची भूमिका, मोठमोठे रोग केवळ योगसाधनेने बिनपैशात बरे करण्याचे दावे, भव्य शामियान्यातील हजारोंच्या गर्दीला एका हाकेसारशी गुडघे टेका, अंगठे धरा वगैरे योगासनांच्या सूचना देण्याची हातोटी या साऱ्याची नशा त्याचे कार्यक्रम पाहाणारांच्या आणि प्रत्यक्ष योग करायला जाणारांच्या डोक्यात भिनली नसती तर नवल. सकाळी उठलं की फुकटात आय़ुर्वेद शिकायला मिळतो अशी शॉर्टकट तज्ज्ञांची चंगळही झाली. आचार्य बालकृष्ण वनस्पती हातात धरून आय़ुर्वेद आणि ओषधी यांचे प्रवचन देऊ लागलेच होते. त्यातून एक वेगळेच साम्राज्य उभे रहायचे होते.
बाबायोगाचे चेटूक पद्धतशीरपणे समाजातल्या योगासने करायचा वेळ परवडणाऱ्या वर्गावर पसरत गेले. कोकाकोलाका उपयोग किसलिये? संडास साफ करने के लिये- या सारख्या घोषणांनी अमेरिकी उत्पादनांना सांसकृतिक विरोध करणारांना चेव आला. कोककोलाचा खप कमी झाल्यावर रामदेवबाबाला आपली ताकद खऱ्या अर्थाने लक्षात आली. २००६मध्ये पतंजली आय़ुर्वेद ही कंपनी बाबायोगा आणि त्याचा उजवा हात बाळकृष्ण यांनी स्थापन केली. भक्तांच्या श्रध्दाळू मनांची जमीन प्राणायामांच्या फाळाने नांगरून झालेली. आपल्या नावे करून झालेली. आता केवळ धंद्याचे बियाणे टाकायचे बाकी होते. दहा वर्षांत या कंपनीची उलाढाल 4500 कोटी रुपयांवर गेली आहे. दर महिन्याला ५०० ते साडेपाचशे कोटीची भर पडण्याचा सध्याचा वाढीचा वेग आहे. बाबायोगाच्या लोकप्रियतेच्या चेटुकात आता जाहिराती, सरकारी पाठबळ अशीही भर पडली आहे. धडकधडकनाचनगुरूंला आता ही जागतिक पातळीवर पोहोचलेली स्पर्धा जाणवू लागली आहे. पतंजली उत्पादने सरकारी मर्जीतल्या उद्योगपतींच्या रिटेल स्टोर्समधून रॅक्सभरभरून विकली जात आहेत. मॅगीवर हल्ला करणे हा बाबायोगाच्या जारणमारणाचाच भाग होता. मग कशा पतंजली नूडल्स आळ्या तेही आपण पाहिले आहे. पुढची तारीख घातलेली उत्पादने आजच बाजारात येत आहेत हेही आपण पाहातो आहोत.
या साऱ्या प्रयत्नांकडे चलो ठीक है एक भारतीय कंपनी पाय रोवू पाहातेय तर काय वाईट आहे असे म्हणून सोडून देता आलेच असते.
पण बाबायोगाचे चेटूक सोडून देण्यासारखे नाही. अर्थात आमच्यासारख्यांनी काही लिहिलं म्हणून या चेटकाला काही फरक पडेल असे नाही याची पुरेपूर जाणीव आहे.
आता बाबायोगाचे इतर आलामंतरकोलाकंतर काय असते ते पहा.
या बाबायोगाने योग आणि प्राणायामांच्या उपयोगातून कॅन्सर- स्तनांचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, प्रोस्टेट, गर्भाशय, पिट्युटरी ग्रंथीचा कॅन्सर आपण बरे करून दाखवल्याचा दावा केला होता. यासाठी आपल्याकडे पुरावे आहेत अशे दावेही केलेच. ते पुरावे कधीही समोर आले नाहीतच.
२००६मधेच एड्ससारखा सिंड्रोम योगासनांनी बरा करण्याचा त्याने दावा केला तेव्हा देशाच्या आरोग्य मंत्रालयाने त्याला ताबडतोब हे दावे करणे थांबवावेत अशी नोटिस दिली. त्याने ते लगेच थांबवलेही. मद्दडांच्या मनाचा कब्जा करण्यासाठी असा फुटकळ दावा थोडा काळ केला तरी पुरेसाच होता.
योग, संस्कृत भाषा एवढ्यापुरतेच शिक्षण घेतलेले असल्याने बाबायोगाकडून आणखी काही अभ्यस्त अपेक्षा करणे चूकच आहे. त्यामुळे होमोसेक्शुअलिटी हा एक रोग आहे असे त्याचे ठासठासून सांगणे त्याच्या कुवतीनुसार बरोबरच होते. जगभरात होमोसेक्शुअलिटीबद्दल जागृती होत असण्याचा तो काळ होता. तिथे बाबायोगाने आपल्या अकलेचे दिवे पाजळून देशातल्या मी माझे स्वतःचे डोके कधीही वापरणार नाही अशी शपथ घेऊन जन्मलेल्या अनेकांच्या मनातला अंधार आणखी गडद केला. आणि होमोसेक्शुअलिटी प्राणायामाने बरी होऊ शकते असे म्हणून न जाणो किती पालकांनी आपल्या मुलांना मानसिक त्रास दिला असेल...
अर्थातच हे दावे करून तशी औषधेही दिव्य औषधी मंदिरमार्फत विकली जाऊ लागली होती.
बाबायोगाची आणखी एक मूठमारी म्हणजे विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देऊन त्यांची मने दूषित करण्यापेक्षा सर्वत्र योगिक शिक्षण सुरू करा असे सांगणे.
बाबायोगाचे पंजाबीड्रेसयुक्त पलायन ज्या आंदोलनात घडले होते ते आंदोलन अखेर हिंदुत्ववादी सरकारला कसे उपयोगी पडले हा आता इतिहास आहे. काळ्या पैशाबाबतच्या उपोषणांची नौटंकी करताकरता बाबायोगा स्वतःच एका काळ्यापैशाबाबतच्या संवादात अडकला होता. पण असल्या गोष्टींची सारवासारव आपल्या देशात कषायवस्त्र ल्यालेल्या कुठल्याही चोराला करता येते हे काही वेगळे सांगायला नको. काँग्रेस नेतृत्वाची फुकटचंबू फौजही या बाबांपुढे झुकत होती, विज्ञानवीर म्हणवणारे, कलाम, भटकर हेही बाबायोगा, बाबाभोगांच्या समोर झुकत आले आहेत.
आज भगव्याचा उद्घोष करणाऱ्या सरकारच्या राज्यात या भगव्याखाली नागव्या असलेल्या बाबाबुवांना भारीच सुरक्षित दिवस आले आहेत. साधी नोटिसही येणार नाही आरोग्यविभागाकडून तर कायदा सुरक्षा विभाग तर हात बांधूनच रहाणार हे स्पष्ट आहे.
एवढा श्रीमंत, सत्तामंत बाबायोगा आता मर्यादा सोडून का बोलू लागला आहे याची ही पार्श्वभूमी आहे.
या देशात (अजून) कायद्याचे राज्य आहे म्हणून- नाहीतर भारतमाता की जय न बोलणाऱ्यांची मुंडकी छाटली असती असे बोलण्याचा माजोरीपणा या बाबायोगाने आज दाखवला आहे. हा बेशरमपणा असाच वाढत जाणार आहे. शांतीच्या नावाने कार्यक्रम भरवायचे आणि त्यात हिंसेलाच उत्तेजन द्यायचे हा कार्यक्रम बेमुर्वतपणे राबवण्यात संघपरिवाराला आता असल्या चेटक्यांचीही मदत मिळू लागली आहे.
हे थांबवणे अवघड होत जाणार आहे. केवळ निर्भय संघर्षच यांना थांबवू शकतो. तो करावा लागेल.
Like
Comment

Monday, April 4, 2016

http://m.maharashtratimes.com/edit/ravivar-mata/etheist-in-maharashtra/articleshow/51664796.cms

हा लेख कालच्या महाराष्ट्र टाइम्समधे प्रसिध्द झाला. आणि मग अर्थातच काही फोन्स, काही मेल्स आणि फेसबुकवरच्या कमेन्ट्स असा प्रतिसाद त्यावर आला.
काही उटपटांग असंबध्द कमेंट्स आल्या नसत्या तरच नवल होतं. तशाच त्या आल्याही. म्हणून विवेकवादाच्या वाटेवर नुकत्याच धडपडत पावले टाकत चाललेल्या लोकांसाठी काही लिहिणे आलेच.
नास्तिक विचाराच्या अस्तित्वाने आणि होय आम्ही नास्तिक आहोत असे छातीठोक पणे सांगणारांच्या अस्तित्वाने बरेच लोक थोडे बावचळतात. कधी रागावतात. त्या वाटेवर जाण्यासाठी थोडे समाजभय ज्यांना आडवे येते, किंवा परंपरांचा पगडा ज्यांना छानच वाटतो ते लोक अशा गुणाढ्य होकारावर जरा जास्तच रागावतात, याचा अनुभव सगळ्याच दिलखुलास नास्तिकांना आलेला असतो. त्यामुळे त्यांना त्याचे विशेष काही वाटत नाहीच. प्रश्न आहे तो नवख्यांचा.
तुम्ही मुस्लिम आस्तिकांवर टीका करीत नाही, तुम्ही ख्रिस्ती आस्तिकांना काहीच म्हणत नाही या नेहमीच्या काड्या टाकल्या जातातच. शिवाय नास्तिक लोक जातीभेद पाळतातच असाही एक अनर्गल बकवास गमतीगमतीत केला जातो. शिवाय नास्तिक लोकांनी एकत्र आलं म्हणजे काय होणार. तेच ते बोअरिंग बोलतात (इंटरेस्टिंग हळदीकुंकू नसतं ना त्यांच्यात!), मग आता यांचा हा एक नवा धर्म, नवी पोथीच तयार होणार का वगैरेही पुळचट युक्तीवाद हुषारीने मांडले जातात. या फडतूस पण तरीही वारंवार होणाऱ्या हल्ल्याला उत्तरे आहेत.
नास्तिक्यविचाराकडे नव्याने वळणाऱ्या लोकांना सांगणे आहे- की नास्तिक मेळावा म्हणजे चळवळ नव्हे किंवा कुणालातरी कन्विन्स करण्याचा मंच नव्हे. जे कुणी या दिशेने विचार करतात त्यांना तुम्ही अयोग्य विचार करीत नाही, या विचारात अनीती नाही, तर कुठल्याही भयगंडातून श्रध्देचा गंज चढवून न घेणारे तुम्ही निर्भय, चमकदार- ब्राईट- लोक आहात हे सांगण्यासाठी इतर नास्तिक एकत्र उभे रहात आहेत.
"नास्तिकांची संख्या वाढेल ही अंधश्रध्दा आहे, किंवा नास्तिकता हीच एक श्रध्दा आहे, किंवा धर्म आहे"... वगैरे वाक्ये टाकणारे आपली या विषयातील समज तोकडी आहे एवढेच जाणवून देतात, मित्र हो. त्याने स्वतःचा बुध्दीभेद करून घेऊ नका. जे विवेकबुध्दीला पटत असेल तेच करा एवढ्याच गोष्टीचा आग्रह धरतात बरेचसे नास्तिक. आणि त्याचाच भाग म्हणून ज्या गोष्टी विवेकाच्या कसोटीवर उतरत नाहीत त्यांचे तसे- अविवेकी, त्याज्य रूप दाखवून देतात नास्तिक.
धर्म, श्रध्दा हे अखेर जवळपास साऱ्याच दुष्कृत्यांचे मूळ जनक असतात हे एकविसाव्या शतकात पुरेसे सिध्द झाले आहे. त्यावर विचार करून स्वतःची वाटचाल ठरवतात नास्तिक. आपण फक्त हा विचार मनात दडपला जाऊ नये म्हणून एकत्र येत आहोत.
अनेकांची बुध्दी केवळ ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो त्यांची मने सांभाळण्यासाठी साखळदंडांत पडते. शिवाय सारे काही परंपरेनुसार करणारांचा जथा सोबत असेल आणि बुध्दीबळ कमी पडत असेल तर त्याही साखळ्या पायात घोटाळतात. आपल्या बुध्दीला विचारांच्या निर्भय प्रवासाची चाकं मिळावीत, आपल्या सदैव घडत रहाणाऱ्या विवेकी, अंतिमत्वाचा दावा न करणाऱ्या मतांना शब्द मिळावेत म्हणून नास्तिकांनी एकमेकांची सोबत आहे हे जाणून राहिले पाहिजे.
आपले मत म्हणजे बाबावाक्यच असे समजणाऱ्या अनेक मतांच्या गल्बल्यापुढे गडबडून जाऊ नये म्हणून हे सांगणे. नास्तिकता अखेर सर्व दुष्कृत्यांचे मूळ "देव हा भ्रम" आणि "भ्रामकतेतूनच निपजलेले कुठलेही  धर्म" हेच आहेत या विचारापर्यंत पोहोचवते म्हणून बरीच गर्दी अस्वस्थ होत असते हे लक्षात ठेवले तरीही पुरे. 

Tuesday, March 29, 2016

काही संभ्रमित प्रश्नांची उत्तरे

काल फेसबुकवर नास्तिक मेळाव्याचे भाषण एका मित्राने शेअर केले. त्यावर एकाने खवळून विचारले मुग्धाताईंना विचारा त्यांनी किती आंतरजातीय विवाह घडवून आणले. अर्थात हा प्रश्न विषयाशी असंबध्द होता. पण गंमत म्हणून जे आहे ते सांगितलं. त्यावर दुसरे एक आस्तिक काका खवळून म्हणू लागले- "आंतरजातीय विवाह करण्याच्या बढायांनी कुठला नास्तिकवाद सिद्ध झाला?"
आणि पुढे हे प्रश्न विचारले.
-धर्म माणसाच्या मनातल्या अंगभूत भीती या भावनेवर मात करण्यासाठी निर्माण झाला असा इतिहास आहे.नास्तिकवाद मानवाला भीतीमुक्त करण्याची ग्वाही देतो का?नास्तिकवाद नेमकी कुठली समाजरचना मांडतो?नास्तिकवादाला नीतीनियम मान्य करीत असल्यास त्याला मान्य असलेले नीतीनियम कुठले?नास्तिकवादाचा टेंभा मिरवणार्यांना सध्या आहे ही समाजरचना मान्य आहे का?असेल तर आस्तिकवाद्यांना ते कुठले स्थान देणार?काय आहेत या प्रश्नांची उत्तरे?-
त्यांना फक्त ही बढाई नाही, प्रश्न आला म्हणून उत्तर दिले एवढेच सांगितले. त्यांनी विचारलेले इतर प्रश्न इतर अनेकांना पडत असतील. म्हणून एकास एक उत्तर न देता ते जरा सविस्तर देण्याचे ठरवले.


धर्म माणसाच्या मनातल्या अंगभूत भीती या भावनेवर मात करण्यासाठी निर्माण झाला असा इतिहास आहे.नास्तिकवाद मानवाला भीतीमुक्त करण्याची ग्वाही देतो का?
धर्म माणसाच्या मनातल्या भीतीतून जन्माला आला. त्याने भीतीवर मात केली नसून भीतीवर मात करण्याच्या मिषाने भीतीचा गैरफायदाच उठवला आहे. उलट नवनवीन भीतीदायक कल्पनांची निर्मिती सर्व धर्मांतून झाली हे पाहू शकता. रौरव नरकांत, सप्तनरकांत सतत भाजून, सोलून निघण्याची भीती ही धर्मांनी निर्माण केली. ख्रिस्ती धर्मांत जे आहे तेच उर्वरित दोन आब्रहमिक धर्मांतही आहे. आणि हिंदू धर्मात तर देवाच्या निर्मितीचा दावा करून- शिरापासून अमके नि पायापासून तमके म्हणून ती उतरंड झुगारून देण्याचा भीतीही मनामनांत रुळवली धर्माने.
नास्तिकवाद नव्हे नास्तिक्य ही भीती झुगारून देता आली की पटते आणि नास्तिक्य एकदा पटू लागले की काल्पनिक अस्तित्वांची भीती नष्ट होण्यास सुरुवात होते.

नास्तिकवाद नेमकी कुठली समाजरचना मांडतो?
व्यक्तीचे विचार स्वातंत्र्य देणारी समाजरचना. पापपुण्याच्या हिशेबाची भीती, त्यातून सुटण्याचे ईश्वराला देण्याच्या लाचेचे प्रयत्न याशिवायच्या  नीतीकल्पनांवर आधारित समाजरचना. स्वतंत्र चिरंतन सत्य आणि भयमुक्त नीती अशी शाश्वत मूल्ये मानवजातीने स्वीकारलीच होती. धर्म हा फार नंतर आलेली लबाडांनी भोळसटांसाठी निर्माण केलेली व्यवस्था आहे. मानवी उत्क्रांतीचा काळ एक लक्ष वर्षे धरला तर त्यातील प्रबुध्द मानव गेली बारा हजार वर्षे अस्तित्वात होता. आणि आहे त्या स्वरुपातले सारे धर्म हे ताणूनताणून गेल्या चार ते पाच हजार वर्षांमधले आहेत. अत्यंत हेकट, भयाधारित समाजरचना झुगारून देऊन गतीशील, नीतीमान समाजाची कल्पना नास्तिक व्यक्ती करतात.
नास्तिकवादाला नीतीनियम मान्य करीत असल्यास त्याला मान्य असलेले नीतीनियम कुठले?
नास्तिकवाद हा मुळातच धर्मजोखडविरहीत नीतीकल्पनांवर भिस्त ठेवतो. व्यक्तीच्या उत्तम क्षमतांचा पूर्ण विकास करण्याची संधी देणारी नीतीची कल्पना नास्तिकांना, विवेकनिष्ठांना अभिप्रेत आहे. अनेक लोकशाही राष्ट्रांच्या घटनांतून मांडलेले मूलभूत हक्क हे नास्तिक लोकांनीच शब्दांकित केले आहेत. व्यक्तिगत अवकाशाची पायमल्ली होऊ न देता, समाजस्वास्थ्य जपणे, त्यात कोणत्याही एका घटकावर अन्याय न होऊ देणे हे प्रमुख आहे. आजवरच्या सर्व भिकार धर्मांनी स्त्रियांना सतत कमी लेखले, दुय्यम गुलामीची वागणूक दिली- हे नास्तिकतेच्या नीतीकल्पनेत त्रिवार बसत नाही.

नास्तिकवादाचा टेंभा मिरवणार्यांना सध्या आहे ही समाजरचना मान्य आहे का?असेल तर आस्तिकवाद्यांना ते कुठले स्थान देणार?

नास्तिकवादाचा टेंभा मिरवणे हा शब्दप्रयोग या व्यक्तीची या विचाराबद्दलची असुरक्षितता जाणवून देतो. टेंभे, पलिते तर धर्मांचेच पाजळले जात आहेत. आपल्या वेगळ्या वाटेचा, विवेकनिष्ठेचा नास्तिकांचा अभिमान हा धर्मनिष्ठांच्या जुलमी अभिमानापेक्षा अगदीच सौम्य असतो. धर्मनिष्ठेच्या, ईशनिष्ठेच्या पाईकांनी जो सामाजिक दहशतीचा सांगाडा गेली काही शतके तयार केला आहे त्यावर हल्ला होईल याची भीती यातून स्पष्टच दिसते. होय तो सांगाडा नष्ट व्हावा हीच विवेकनिष्ठांची अंतिम इच्छा असेल. आणि त्यासाठी दीर्घकाळ, अेक शतके जावी लागतील याचेही भान विवेकनिष्ठांना आहे. जसे गेली पाच हजार वर्षे धर्माचे सांगाडे उभे करण्यात गेली पुढील हजारो वर्षे तो नष्ट करण्यात जातील. अखेर हा मानवी बौध्दिक उत्क्रांतीच्या प्रवासाचा भाग आहे- उत्क्रांती सावकाश होत रहाते, आणि त्याला गती देण्याचे बारीकसे काम जगातील विवेकनिष्ठ बुध्दीवंत सातत्याने करत रहातील. 
ही आहेत तुमच्या कोपित पण संभ्रमित प्रश्नांची उत्तरे.

विवेकाचे अस्त्र

द फाउंटनहेड या कादंबरीतील हा एक फार बोलका परिच्छेद. व्यक्तीस्वातंत्र्य हिसकावून घेऊन हुकूमशाही आणण्याच्या प्रयत्नातला एक विद्वान एल्सवर्थ टूही आपलं मनोगत व्यक्त करतो आहे...
जे चाललं आहे जगात आजवर ईशवाद, धर्मवाद किंवा एकसंध विचारप्रणालींचा वर्चस्ववाद याबाबत सावध करणारं हे मनोगत. 

"माणसाकडे एक अस्त्र आहे. विवेकाचं. त्यामुळे ते त्याच्याकडून काढून घेणं हे महत्त्वाचं. विवेकाचे आधारच काढून घ्यायचे. काळजीपूर्वक हं... तो अगदीच नाकारूनही चालत नाहीत. काहीही पूर्णपणे नाकारून चालत नाही, नाहीतर मग हातचा डाव जातो. विवेकविचार म्हणजे पाप नाही ठरवून चालत... काहींनी तेही करून झालंय म्हणा... आणि यशस्वीही झाले ते. पण तरीही आधुनिक जगात आपण एवढंच म्हटलेलं पुरे असतं... की विवेकनिष्ठेला मर्यादा असतात. त्यापलिकडेही काहीतरी आहे म्हणायचं. काय? काहीही स्पष्ट करण्याची गरज नसते. त्यापलिकडे काहीही कितीही असू शकतं... ’अंतःप्रेरणा’- ’भावना’- ’साक्षात्कार’-’अंतर्ज्ञान’- ’द्वंद्वात्मक पदार्थवाद’. कुठेतरी एखाद्या गुंतागुंतीच्या मुद्द्यात अडकलात आणि कुणी सांगितलं की तुमच्या तत्वांना काही अर्थ नाही- तर काय आपण तयारच असलं पाहिजे... आपण सांगून द्यायचं की रूढ अर्थांच्या पलिकडेही काहीतरी असतं. केवळ विचार करता थोडं महत्त्व भावभावनांनाही द्यायला हवं. थोडी श्रध्दा हवी. विवेक खुंटीला टांगला की एक जोकर वापरता येतो. तुम्हाला जे हवं ते बोलू शकता तुम्ही. गरजेनुसार बदल करू शकता आपल्या युक्तीवादात. तुमच्या घोळात अडकतोच तो. विचारी माणसांवर राज्य करता येईल कां कुणाला? आम्हाला विचारी माणसंच नको आहेत.

Sunday, March 27, 2016

नास्तिक परिषद, नाशिक. मार्च २०१६ मधील माझे भाषण


माझा देवावर विश्वास नाही- असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे हे पहिल्याप्रथम म्हणून टाकते. मी असं म्हटल्यावर इथे कुणीही दचकणार नाही याची मला खात्रीच आहे.
माझा अमुकतमुकवर विश्वास नाही असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा हे अमुकतमुक अस्तित्वात असतात. खरेखुरे अस्तित्व असते त्यांचे. ते तसे नसते तर त्यांच्यावर विश्वास ठेवणे वा अविश्वास दाखवणे अशक्य होते. पण देवावर विश्वास नाही असे म्हणणे म्हणजे जे अस्तित्वातच नाही त्याच्या अस्तित्वालाच मुळात मान्यता दिल्यासारखे होते. माणसांनी पूर्वापार निर्माण केलेल्या, सर्व संस्कृतीत रुळलेल्या, पण आता निरुपयोगी किंवा उपद्रवीच ठरलेल्या देव किंवा ईश्वर या खोट्याखोट्या समाधानदायक संकल्पनेवर विश्वास नाही असेच आपल्याला स्पष्ट म्हणायची सुरुवात करावी लागेल.
देव ही कल्पना एक दावा आहे. या दाव्याला आजवर कुणीही खडखडीत, स्पष्ट पुरावा देऊ शकलेलं नाही. जे काही आहे ते पुरावे नसलेले चमत्कारिक असे काही दावे, आणि आणखी काही पोकळ दावे.
इतर कोणत्याही विवाद्य विषयात पुराव्यांशिवायचे कोणतेही दावे खरे मानले जात नाहीत. ते दावे खरे ठरण्यासाठी अनंत काळपर्यंत पुराव्यांची वाट पाहात रहाण्याचा प्रश्नच वास्तवात उद्भवत नाही. असे दावे सरळपणे निकामी म्हणून फेकून द्यावे लागतात. पण हा देवाचा विषय मात्र सगळ्या धर्मांनी काहीही तथ्याशिवाय टिकवून धरलाय.
ईशकल्पनेच्या भोवती विणल्या गेलेल्या प्रत्येक धर्माच्या जाळ्याचे धागेदोरे मोठे घट्ट आहेत. पण कोळ्याच्या जाळ्याच्या केंद्रकाशी ज्याप्रमाणे काही विशेष वेगळे नसते- धाग्यांचाच बोळा असतो तसेच धर्मांच्या संकल्पनात्मक जाळ्याच्या केंद्रकापाशी अशाच संकल्पनात्मक धाग्यांचाच चिकटा असतो. अतिशय चिवट धागे- पण कोणत्याही वेगळ्या अस्तित्वाचा पत्ता नसतो. वेगवेगळ्या प्रांतप्रदेशांतल्या, विविध प्रकारच्या कल्पनाशक्ती असलेल्या लोकांकडून निर्माण झालेले दावे म्हणजे ईशकल्पना.
देव या संकल्पनेवर विश्वास का नाही- देव नाही याचा पुरावा काय याचे उत्तर विश्वास नसलेल्यांनी देण्याची अपेक्षा करणे गैर आहे. देव आहे असा दावा करणाराने तो असल्याचा पुरावा द्यायला हवा, आणि तसा वादातीत पुरावा ते जोवर देऊ शकत नाहीत तोवर काही अर्थ नाही. त्यांच्या लाडक्या पोकळ संकल्पनेवर विश्वास न ठेवणारांना त्यांनी त्रास देणे, हिणवणे हा केवळ झुंडीचा बिनडोकपणा एवढेच म्हणता येईल.
आपण सारे या बिनडोकपणाविरुध्द ताठरपणे उभे रहातो. अर्थातच आपणा सर्वांना भेटून आनंद झालाय.
या कार्यक्रमाचे आयोजक, अमित, श्यामला, दीप्ती आणि आजचे माझ्यासोबतचे माननीय वक्ते उत्तम कांबळे, श्रोत्यांमधे उपस्थित असलेले अनेक मित्र, कविता महाजन, निरंजन टकले, मिलिंद मुरुगकर, फेसबुकवर मैत्री झालेले अनेक समविचारीही येणार म्हणाले होते- या सर्वांना अभिवादन करून मी आज जो विषय मांडायचा आहे- नास्तिकांचे जगासाठी योगदान- यावर बोलायला सुरुवात करेन.
या विषयाच्या शीर्षकात एक मोठा बदल आपल्याला करायला हवा. तो मी करते आहे. नास्तिकांचे योगदान याबरोबरच नास्तिकत्वाचे योगदान काय या प्रश्नाचे उत्तर देऊ. नास्तिकांचे योगदान काय असे म्हटले की आपोआपच आस्तिकांचे योगदान काय याची मोजदाद सुरू होईल. आणि जग बराच काळपर्यंत धर्मदंडुक्यांच्या दहशतीत किंवा धर्म, ईश्वर आणि कंपनीच्या रेशमी चाबकांत गुरफटून वाटचाल करीत राहिल्यामुळे आस्तिकांचे प्रत्यक्ष योगदान जास्तच दिसेल. आणि ते दिशाभूल करणारे ठरेल. कित्येक विद्वानांनी आपण देव या समजुतीला भ्रामक मानतो हे आजुबाजूच्या समाजाला कळूही दिले नव्हते.
अगदी आताही अनेक लोक सामाजिक, कौटुंबिक दबावांमुळे आपल्या बुध्दीला देव पटत नाही, आपण निरीश्वरवादी आहोत, किंवा धर्म कालबाह्य झाल्याचे आपल्याला पटते असे उघड मान्य करीत नाहीत. शिवाय आस्तिक-नास्तिक अशा गटांचे योगदान असते की त्यातील बुध्दीमान व्यक्तींचे योगदान असते हा प्रश्नही उभा रहातोच. त्यामुळे आपण नास्तिकतेचे योगदान काय आहे त्यावर लक्ष केंद्रित करू. देव-धर्माच्या कल्पना अमान्य करण्याचे धैर्य आणि रूढ कल्पनांना सत्याच्या शोधासाठी आव्हान देण्याची क्षमता म्हणजेच नास्तिकत्व. या गुणांचे जगासाठी काय योगदान आहे याचा अधिक विचार करू.
नास्तिकांचे योगदान जगात काय हे सांगायचे तर आज विकीपिडीया अख्खी यादीच देतो अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, कलावंत असलेल्या नास्तिकांची. ज्यातील अनेकांच्या खांद्यांवर आजचं जग उभं आहे. पण मग विकीपीडीया धर्मिक शास्त्रज्ञ, कलावंत यांचीही यादी देतो. यातून अनेक कर्तृत्ववान व्यक्ती या नास्तिक होत्या हे समजून येण्याचे समाधान आपल्याला लाभते हे नक्कीच. पण त्याच स्वरुपाचे समाधान आस्तिकांनाही मिळू शकते.
नोबेल लॉरिएट्सच्या बाबतीत ही गणना झालेली आहे. नास्तिकांची संख्या त्यात जास्त आहे असे दिसून येताच ते नास्तिक नव्हेतच, ही गणना चुकीची आहे हे दाखवण्याचे खटाटोप सुरू होतात.
असं आहे की नास्तिक- ईशकल्पनेवर विश्वास नसलेले कोणतेही नास्तिक कुठल्याही धर्माचे नसतात. ज्या धर्मात आपण अपघाताने जन्म घेतो त्या धर्माचे लोक ज्या परंपरा, वागण्याबोलण्याचीखाण्यापिण्याची संस्कृती अनुसरतात तीच संस्कृती आपण नास्तिकही अनुसरतो. पण म्हणून त्या संस्कृतींच्या मुळाशी असलेल्या- बाळपणापासून धार्मिक संस्कारांच्या मुसळाने नरड्याखाली ढोसून उतरवलेल्या देवाच्या कल्पना नास्तिकांना मान्य नसतात. किंवा कधीतरी आयुष्याच्या प्रवासात त्यांनी त्या मुसळासकट ढोसलेल्या कल्पना फेकून दिलेल्या असतात. आईवडिलांच्या प्रेमापायी क्वचित् श्रध्देचे नाटक केले तरीही ती श्रध्दा वेडगळ आहे हे त्यांना माहीत झालेले असते. विचारांची, बुध्दीची स्वतंत्रता, मनाची निर्भयता हे नास्तिकत्वाचे विशेष आहे. आणि असे नास्तिकत्व विज्ञान-तंत्रज्ञानात गती असलेल्या प्रज्ञेशी संयोग पावले तर मग अशी प्रज्ञा मानवीच काय कोणत्याही जीवसृष्टीसाठी आश्चर्यकारक योगदान देऊ शकते.
पाश्चात्य जगात असे बव्हंशी मानले जाते की नास्तिकतेची कल्पना ही अलिकडच्या काळातली- औद्योगिक क्रांतीनंतर, विचारप्रवर्तनाचे प्रबोधन युग सुरू झाले त्यानंतरची आहे. पण तसे नाही असे संशोधन आहे. प्रा व्हिटमार्श यांनी या विषयावर एक पुस्तकच प्रसिध्द केले आहे- बॅटलिंग द गॉड्स. प्राचीन काळातही नास्तिक विचार होता हे ते त्यातून दाखवून देतात. मानववंश जेव्हापासून साधने तयार करू लागला तेव्हापासून अशी स्वयंप्रज्ञ माणसे- रूढ जीवनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करणारी माणसे नक्कीच अस्तित्वात असतील. ज्यांनी केवळ निसर्गातील न कळणाऱ्या घटनांना चमत्कार मानून माथे झुकवले त्यांच्याहून वेगळी- चाकाचा विचार करणारी, अग्नी निर्माण करण्याच्या विचार करणारी, निवाऱ्याचा विचार करणारी, दगडी हत्यारांचा विचार करणारी अनेक माणसे होतीच. ईश्वरसदृश मानीव शक्तीच्या हाती आपला जीव सोपवून गप्प न रहाता धडपड करणारी सारी आदिम माणसे ही या नास्तिकत्वाची पूर्वसुरी होती. पण व्हिटमार्श यांनी प्राचीन रोमन साम्राज्यातील नास्तिक विचारवंतांचा लेखाजोखा मांडला आहे.
प्राचीन भारतात तर आता ज्यांच्या शिकवणीचे संघटित धर्मच तयार झाले त्या बुध्द, महावीरांचा विचार वेदप्रामाण्य नाकारणाराच नव्हे, तर निरीश्वरवादी असाच होता. दुर्दैवाने या विचारातील मुक्त निरीश्वरवाद, नीतीतत्वे पोथीनिष्ठ झाली, प्रतीकनिष्ठ झाली आणि त्यांच्या नास्तिकत्वाचे त्यांच्या अनुयायांनी बारा वाजवले. आजीवकांची परंपराही लुप्त झाली.
पण मुक्त निर्भय विचारशक्ती असलेले आणि तिचा अंमल करण्याचे धैर्य दाखवणारे नास्तिकत्व कोणत्याही धर्माचे अस्तित्व आवश्यक मानत नाही. कोणत्याही देवाधारित पापपुण्याचे, स्वर्ग-नरकाच्या कल्पनांचे अस्तित्व मानत नाही, नास्तिकत्वाच्या नीतीनिष्ठा, सदसद्विवेक, मूल्यनिष्ठा या कुठल्यातरी नरकात जळत रहाण्याच्या कल्पनेतून येत नाहीत, मेल्यानंतर प्रेताला किडे पडण्याच्या कल्पनेतून येत नाहीत, आणि गंगेत बुडी मारून, किंवा मक्केला जाऊन किंवा चर्चमधे कबुलीजबाब देऊन केलेली पापे धुतली जातात या आशेने एखाददुसरे पाप करून टाकू बुवा असेही नास्तिकत्वात शक्य नाही. दुष्कृत्य केले तर त्यातून देव आपल्याला तारून नेईल असे न म्हणता आपल्या दुष्कृत्याची शिक्षाही भोगायला बळ देते ते नास्तिकत्व. धर्मनिष्ठांतून निर्माण झालेल्या अनेक दुष्कृत्यांचा उगम असलेला धर्मच नाकारून आव्हान देण्याचे सामर्थ्य नास्तिकत्वात आहे. नास्तिकत्वाचे सर्वात मोठे, महत्त्वाचे असे योगदान हेच आहे.
नास्तिकत्वाला सर्वात मोठा सामना करावा लागला होता तो ख्रिस्तीधर्मातील सनातन्यांचा. गेली दोन हजार वर्षे जगभरात पसरलेला आद्य संघटित धर्म होता ख्रिश्चॅनिटीचा. यातील जीझस या तथाकथित देवाच्या पुत्राच्या दयाकरुणेच्या कथाच कथा ऐकायला मिळतात. चमत्कारांच्याही कहाण्या धर्माच्या गळाचे आमिष म्हणून आहेतच. पण याच धर्माचे अनुयायित्व जगातील सर्वांनी स्वीकारावे यासाठी ख्रिस्ती धर्मगुरूंनी जगात अनेक शतके धुमाकूळ माजवला, अनन्वित पाशवी अत्याचार केले हा इतिहास आहे. भारतात अनेकांना वाटते की त्यांच्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्यापाठीमागे उभ्या असलेल्या विदेशी सत्ताधाऱ्यांनी केवळ धर्मांतरासाठी दुसऱ्या देशांत जाऊन अत्याचार केले. तसे मुळीच नाही. त्यांनी विचहंट केले- चेटक्यांची शिकार... म्हणजे सैतानाची जादू करण्याच्या मनगढन्त आरोपांवरून त्यांच्या स्वतःच्या देशांतच लाखो लोकांवर, स्त्रियांवर, अगदी दोनदोन वर्षांच्या लहान मुलांवरही जिवंत जाळण्याचे प्रयोग केले. जाळून सैतान नष्ट करायचा असा त्यांचा विश्वास होता. विज्ञानाची प्रगती ही या धर्मवेड्यांमुळे अनेक शतके थांबली होती. गलिलिओ गलीली, कोपर्निकस यांचे नवे शोध त्यांनी मुसक्या बांधून थांबवले. ज्याला अंधारयुग म्हणतात तो कालखंड आणि इन्क्विझिशन्स, क्रुसेड्सचा कालखंड एकच होता- हा काही योगायोग नव्हे. या काळात कोणतेही नवे प्रयोग होऊ शकले नाहीत, किंवा जिज्ञासू मनांनी ते चोरून लपून सुरू ठेवले. मानवी मृतदेहाची चिरफाड करायला बंदी, नवीन औषधे विकसित करण्यास बंदी, नवी साधने विकसित करण्यास बंदी... ख्रिश्चन धर्मवेडाने आजवरही नव्या तंत्रज्ञानाला, नव्या विज्ञानाला विरोध करण्याची परंपरा पाळली आहे. पूर्वी ते अँटिबायोटिक्सना विरोध करीत होते, आता ते जेनेटिक मोडिफिकेशनला विरोध करतात, स्टेम सेल् रिसर्चला विरोध करतात. मानवाची ज्ञानाच्या विज्ञानाच्या वाटेवरची पावले खेचण्याचेच काम धर्मवेड्या, ईश्वरश्रध्द माणसांच्या झुंडींनी केले. याला छेद देऊनही जगाचा भार आपल्या खांद्यावर रक्तबंबाळ होऊनही घेत रहाणारे होते जगभरात पसरलेले एकेकटे नास्तिक. त्यातील काहीजणांना तर आपल्या स्वतःच्या नास्तिकतेच्या प्रवासाची कल्पनाही नव्हती. आपल्या स्वयंप्रज्ञ विवेकाच्या हाकेला ते ओ देत राहिले. आजवर न उलगडलेल्या कोड्यांची उत्तरे देवावर ढकलून न देता शोध घेणे एवढेच त्यांनी आपले नीतीकर्तव्य मानले.
डेविड मिल्स याने लिहिलेल्या अथीस्ट युनिवर्स या पुस्तकात त्याने स्वानुभवाचाच एक किस्सा दिला आहे. चमत्कारी उपाय, फेथ हीलींग वाल्या एका ख्रिश्चन धर्मप्रसारकाच्या त्याच्या गावातल्या फेऱ्याला त्याने विरोध करायचं ठरवलं. कारण हा बाबा डायबिटीज् झालेल्यांनी आपली औषधे, इन्शुलिन इंजेक्शन्स फेकून द्यावीत, कॅन्सरच्या रोग्यांनी केमोथेरपी वगैरे बंद करावी आणि ख्राईस्टच्या आशीर्वादाने रोग बरे करून घ्यावे म्हणून प्रचाराचा धडाका लावत होता. याला विरोध होणे आवश्यक आहे म्हणून मिल्सने तेथे मोर्चा, धरणे वगैरे निदर्शने करायची ठरवली. पण पोलिसांना माहिती द्यायला गेल्यानंतर एकामागोमाग एक सात-आठ पोलिसांनी- हवालदार ते अधिकारी अशा उतरंडीतील सर्वांनीच- आम्ही तुलाच धडा शिकवू, गडबड झाली तर तुलाच अटक करू, मी तुझे दात घशात घालायची वाट पाहीन अशा भाषेत त्याच्या मोर्चाला संरक्षण नाकारले होते. तरीही त्याने मोर्चा काढलाच. आणि त्यात फार काही गडबड झाली नाही. पण भीतीपोटी गप्प न बसणे, मानवकल्याणासाठी दडपण सोसणे हे नास्तिकांच्या नीतीश्रेष्ठत्वाचेच प्रमाण समजले पाहिजे. आपल्यासारख्या नास्तिकांना काहीही चांगले काम करायला त्या काल्पनिक ईश्वराकडून, देवदेव्यांकडून, त्यांच्या दलाल धर्मगुरूंकडून, मुल्लांकडून, बाबाबुवामाँसाध्व्यांकडून एटी जीचं सर्टिफिकेट मिळायची गरज भासत नाही. हे नास्तिकतेचं आपापल्या भोवतालच्या समाजासाठी फार मोठं योगदान आहे.
नास्तिकतेचा प्रवास हा ज्याचा त्यानेच करावा लागतो. विवेकी निर्णयनाच्या टप्प्याकडे येणारी वाट प्रत्येकाला एकेकट्यानेच कापावी लागते. झुंडीचे मेंदूधुलाई तंत्र इथे कामास येत नाही. आपला निर्णय, आपल्या विचारांची निश्चिती ही स्वतःच्या जबाबदारीवर करणे हा नास्तिकत्वाचा दुसरा अर्थ आहे. शहीद भगतसिंगांनी केले म्हणून आम्ही हे अनुसरतो असे कुणी म्हणू शकत नाही. नाहीतर आज शहीद भगतसिंगांच्या नावाचा वापर करून जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय गोमाताचे नारे जपत रहाणारे आपण पाहातोच आहोत. कुठल्या ना कुठल्या देवाधर्माच्या पगड्याखाली असलेल्या पालकांच्या पोटी- अर्ज न करता- जन्म घेतलेल्या मुलांना बाळपणापासून बाप्पा जयजय शिकवले जाते, बाप्तिस्मा देऊन सेव्ह केले जाते, किंवा नमाजाचा व्यायाम आणि येता जाता या अल्ला परवरदिगारची रट शिकवली जाते. त्यात्या धर्माप्रमाणे जेजे ठरीव संस्कार असतील तेते मुलांना भोगावे लागतात. पर्याय नसतो. हिंदु धर्मात जन्मलेली मुले येताजाता दिसेल त्या देवळासमोर चपला अर्धवट काढून धावता नमस्कार करायला शिकलेली असतात. सगळे धार्मिक, देवकल्पनाकेंद्री सण, उत्सव मौजमजेशी जोडलेले असतात. अशा वेळी ते सारे कधीतरी बुद्धीला पटत नाही म्हणून नाकारून विज्ञानदृष्टीचा प्रवास सुरू होतो. आपण आज आस्तिक होतो आणि उद्या नास्तिक झालो असेही होत नाही. ती वैचारिक कसोटी स्वतःची स्वतःच द्यावी लागते, आपलं आपण निष्कर्षांपर्यंत पोहोचायचं असतं. साथ असते ती केवळ नास्तिकत्वाचा प्रवास केलेल्या लेखकांच्या पुस्तकांची, ज्ञानाच्या वाटांची.
अलिकडेपासून हिंदू म्हणवल्या जाणाऱ्या भारतीय आचार धर्मात सर्व विचारप्रवाहांना स्थान असणे- हा इतिहास होता- आताची परिस्थिती वेगळी झाली आहे. पण इतिहासात मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा ज्यू या आब्राह्मिक एकेश्वरी धर्मांतील नास्तिकांना अगदी ठेचून मारण्याची असहिष्णुता होती ती हिंदू धर्मात बराच काळपर्यंत नव्हती. हिंदू धर्मातील देव न मानण्याबद्दलची असहिष्णुता मर्यादित होती. (आता तीच असहिष्णुता गायीचं देवत्व मान्य नसणारांना ठेचून मारण्यापर्यंत परिणत झाली आहे हा भाग वेगळा!) ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकापासून ते इसवी सनाच्या बाराव्या सतकापर्यंत टिकून असलेले चार्वाक म्हणजेच लोकायत किंवा बार्हस्पत्य विचाराच्या तत्वचिंतकांना त्रास जरी झाला तरीही त्यांना सरसकट ठार केलेच असेल असे नाही. पण केले नसेल असेही नाही. निर्भयपणे देव, परलोक, पुनर्जन्म, आत्मा वगैरे संकल्पनांना पूर्णपणे फाटा देणाऱ्या या ऐहिक विचारांच्या तत्वज्ञानाला इतर पाच दर्शनांनी बऱ्यापैकी बदनाम केले. पण त्यांचा गलिलीओसारखा छळ झाला किंवा जिओर्डानो ब्रूनोसारखे जाळण्यात आले असेही झाले नसावे. ते केवळ राजाश्रयाअभावी किंवा नंतर लोकाश्रयाअभावीही नामशेष झाले असतील- अजून यावर संशोधन सुरू आहे. पण म्हणजे भारतातला हिंदू किंवा वैदिक धर्म थोर ठरतो असं अजिबातच नाही हे आपण सर्वांनी पाहिलंय. या धर्मात देवाच्या कल्पनेच्या मदतीने रचलेल्या उतरंडींतून झालेली दुष्कृत्ये हजारो वर्षांपासून समाजातले लोक भोगत आहेत. स्त्रिया, आणि देवाच्या नावाने शूद्र ठरवण्यात आलेले लोक यांचे मानवी हक्क नाकारणारा हाही धर्म आहे. त्यामुळे एकेश्वरी हेकट धर्मांच्या जुलमीपणाच्या रांगेत हा धर्मही वेगळ्या कारणांनी बसतोच. तरीही नास्तिक म्हणून छळ करणे या धर्माच्या लोकांनी फार डोळ्यात येईल एवढ्या प्रमाणात- ख्रिस्तींप्रमाणे नक्कीच केले नाही.
अजूनही आपल्यासारख्या नास्तिकांना भारतीय समाजात वावरताना- हो... त्यांचा काय देवावर विश्वास नाही एवढे जरा हिणवून बोलणे सोडले तर फारसा टोकाचा त्रास होत नाही. जो काही कौटुंबिक दबाव असतो किंवा सामाजिक दबाव असतो तो आपण मनावर घेतलं तर झुगारून देता येतोच. आपल्याला फारसे शौर्य गाजवावे लागत नाही. तरीही सामाजिक दबावाला तोंड देत काही गोष्टी नाहीच करणार म्हणण्याचे धैर्य खऱ्या नास्तिकांना दाखवावेच लागते. नाही करणार पूजा, नाही देणार ब्राह्मणाला देवाच्या दलालीची दक्षिणा, नाही करणार खर्च फालतू देवकेंद्री सणांवर, नाही जोडणार हात- असे नकार. आणि हो- योग्य तेच करणार, स्त्रिया आणि शूद्रांना स्वातंत्र्य असू नये हा मूर्खपणा धिक्कारणारच, देवाच्या नावाखाली चाललेल्या लूटमारीला अडवणारच, सणांच्या नावाखाली चाललेले जलप्रदूषण रोखणारच, ध्वनी प्रदूषण रोखणारच, देवळांमधला भ्रष्टाचार अडवणारच असे अनेक होकार आपल्याला धैर्याने द्यावेच लागतात. निर्भय विवेकनिष्ठेचे उदाहरण घालून देण्याचे खरे योगदान नास्तिकांचे आहे.
या दैनंदिन जगण्यापुढे जाणारे नास्तिकांनी हाताळलेले प्रश्न कोणते?
आठवत असेल आपल्या मराठी शाळांतील अगदी पहिलीच्या वर्गापासून हे गृहीतक आपल्या गळी उतरवले जात होते. देवा तुझे किती... सुंदर आकाश सुंदर प्रकाश देव देतो. ही असली बिनडोक गीते जितक्या लवकर पाठ्यपुस्तकांतून जातील तेवढे बरे. करायला हवं काहीतरी. सध्या कठीण आहे.
तर- आस्तिकांचा, धर्मांचा मुख्य मुद्दा असतो ते या जगाच्या, या विश्वाच्या निर्मितीचा. हे जग ईश्वराने निर्माण केले आहे हे प्रमुख गृहितक असते. या प्रमुख गृहीतकाला धक्का लावण्याचे काम करणारे विश्वउत्पत्तीशास्त्र अर्थात् कॉस्मॉलजीचे अभ्यासक प्रामुख्याने नास्तिक किंवा नास्तिकतेकडे झुकणारे अज्ञेयवादी होते.
आल्बर्ट आइन्स्टाईन, रिचर्ड फेनमान्, फ्रेड हॉइल, स्टीफन हॉकिंग, रॉजर पेनरोझ असे अनेक कॉस्मॉलजीकल-मॅथेमेटिकल-ऍस्ट्रोफिझिक्सवरील रिसर्च करणारे शास्त्रज्ञ नास्तिक होते. अलिकडे गाजलेल्या लार्ज हॅड्रॉन प्रोजेक्ट ज्या हिग्ज-बोसॉन कणांच्या संशोधनातून सुरू झाला त्या कणांना शोधून काढणारे प्रमुख वैज्ञानिक पीटर हिग्ज नास्तिक आहेत. पण नास्तिकत्वाचा येन केन प्रकारेण अधिक्षेप होतोच तसे त्यांच्या विश्वनिर्मितीच्या मुळाशी असलेल्या कणांना काही लोकांनी गॉड पार्टिकल असे टोपणनाव दिले. प्रोफेसर हिग्ज यांनी यावर तीव्र नापसंती व्यक्त केली. आल्बर्ट आइन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग यांच्या अनेक विधानांचा सोयिस्कर गैर अर्थ लावून ते आस्तिकच आहेत असा प्रचार सुरू झाला होता. अखेर त्यांना स्पष्ट शब्दांत आपला देव या कल्पनेवर विश्वासच नसल्याचे सांगावे लागले. आइन्स्टाईनला ज्यू धर्मीयांनी, अमेरिकन सश्रध्दांनी अमाप द्वेषयुक्त पत्रे पाठवली. पण तो आपल्या भूमिकेपासून मागे हटला नाही. स्पिनोझाचा देव म्हणजे निसर्ग हाच देव अशी मांडणी करून त्याने व्यक्तिगत जीवनात ढवळाढवळ करणाऱ्या देवाचे अस्तित्व सपशेल नाकारले. आइन्स्टाइनच्या स्पेसटाईम मांडणीने एका शतकानंतर ग्रेविटेशनल वेव्जचे अस्तित्व सिध्द झाले तसेच त्याच्या ईश्वरकल्पना नाकारण्याने आजही वादांना तोंड फुटते आहे आणि तात्विक भूमिका मांडल्या जात आहेत.
गेल्या दोन दशकांपासून डेविड मिल्स, रिचर्ड डॉकिन्स, ख्रिस्तोफर हिचिन्सन, डॅनिएल डेनेट, सॅम हॅरीस, आयान हिरसी अली अशा अनेक नास्तिकतेचे तत्व मांडणाऱ्या वैज्ञानिक तत्वचिंतकांनी विपुल लेखन केले आहे. आपण सर्व लोकांनी डेविड मिल्सचे अथीस्ट युनिवर्स आणि रिचर्ड डॉकिन्सचे द गॉड डिल्यूजन वाचायलाच हवे बरं का.
आज युरोपीय जगात नास्तिकत्वाचा प्रभाव वाढत चालला आहे. आणि यात फार मोठे योगदान युरोपातील नास्तिक विचारवंतांचे, वैज्ञानिकांचे आहे यात शंकाच नाही. पण मघाशी म्हटल्याप्रमाणे रोमन संस्कृतीपासून ईश्वर संकल्पनेवर किंवा त्याच्या निर्मितीवर प्रश्नचिन्ह ठेवणारे तत्वज्ञ होऊन गेले. ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात भारतीय चार्वाक परंपरेच्या पाठोपाठ ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात डियागोरास नावाचा रोमन कवी देवाचं अस्तित्व निर्भयपणे नाकारत होता. त्याला पाश्चात्य जगात पहिल्या नास्तिकाचा मान आहे. चार्वाक हा एक गट असल्यामुळे अजित केशकंबली या एका नावाशिवाय आपल्या हाती ठोस नावे फारशी लागत नाहीत. सॉक्रेटिसच्या आधी पुन्हा ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकाच्या उत्तरार्धात एम्पेडोक्लीज नावाचा सिसिलीमधील तत्वज्ञ देवाचे अस्तित्व मानणे नाकारून अगदी पहिलीवहिली विश्वोत्पत्तीची थिअरी मांडू पाहात होता. सॉक्रेटिसनेही देवाची तत्कालीन कल्पना नाकारलीच होती.
ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात थिओडोरस नावाच्या तत्ववेत्त्याने देवांचे अस्तित्व नाकारले आणि देवांसंबंधी म्हणून एक ग्रंथही लिहिला. एपिक्युरसने जगण्यासाठी दैवी हस्तक्षेपाची गरज नाही असे सांगितले. आपले आपण शांतपणे जगावे, दैवी शक्तींच्या कोपाची भीती बाळगणे व्यर्थ आहे असे त्याने ठणकावून सांगितले. असेलही देव, पण धर्माच्या भीतीमुळे मानवी आयुष्यातला आनंद नष्ट होण्याचेच काम अधिक होते असेही एपिक्युरसच्या अनुयायांनी सांगितले. आज दोनहजार चारशे वर्षांनंतर हे आपल्याला जवळपास प्रत्येक धर्मातील अतिरेकी पटवून देत आहेत. ड रेरम नेच्युरा या दीर्घकाव्याचा कर्ता ल्युक्रेटिअस याने अनेक कल्पना त्याच्या काव्यात मांडल्या. त्यात देवापेक्षा निसर्गच सामर्थ्यवान असल्याचे म्हटले होते.
नास्तिक किंवा ख्रिश्चन धर्ममान्य तत्वांना संपूर्णपणे नाकारणारे आव्हान देणारे अनेक विचारवंत होते. आपणांपैकी बहुतेकांना जिओर्डानो ब्रूनोचे उदाहरण माहीत असते. पण त्याच्याचसारखे छळ सोसून मेलेले, क्रूरपणे मारले गेलेले अनेक आहेत. १६८९मध्ये काझिमिएझ विसझिन्स्की या पोलिश विचारवंताचा धर्म-न्यायपालिकेने खून केला. त्याने देव अस्तित्वात नाही अशा नावाचे निबंध लिहून नास्तिकवादाचा उघड पुरस्कार केला. त्याच्यावर घाईघाईने खटला चालवून त्याला अगदी ताबडतोबीने- त्याला वाचवण्याच्या पोलिश राजाच्या प्रयत्नांना धूप न घालता- धर्मगुरूमंडळाने क्रूरपणे ठार केले. गरम सळईने त्याची जीभ हासडून मग त्याचा शिरच्छेद करण्यात आला. यानंतरच १७६६मध्ये वोल्तेअरचे सारे प्रयत्न निष्फळ ठरून फ्रँको- ज्याँ ड ला बॅरे याचाही फ्रान्समध्ये नास्तिकतेच्या आरोपावरून शिरच्छेद करण्यात आला. ब्रिटिश नाटककार ख्रिस्तोफर मार्लो याच्यावर नास्तिकतेचा आरोप ठेवला गेला. सुनावणी सुरू होण्याआतच त्याचा खूनही करण्यात आला.
परिस्थिती बदलू शकणारा एक विचार मिटवण्याची घाई जेव्हा प्रस्थापित असत्यांना होते तेव्हा यंत्रणा कशा कामाला लागतात याचा अनुभव आपणही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा घेऊ लागलो आहोत. म्हणून ब्रूनो, काझिमिएर्झ, फ्रँको-ज्याँ, बॅरे यांच्या योगदानाचीही आठवण ठेवली पाहिजे. नास्तिकतेच्या विचाराचे हे हुतात्मे आहेत.
काझिमिएर्झने जे लिहिले त्यातून त्याची तीव्र मते लक्षात येतात. तो त्याच्या ड नॉनएक्झिस्टेन्शिया डेइ या लिखाणात स्पष्टपणे म्हणतो-
“देवाला माणसाने निर्माण केले. देव ही संकल्पना मानवनिर्मित आहे. त्यामुळे लोक हेच ईश्वराचे निर्माते आहेत. खराखुरा ईश्वर अस्तित्वात नाहीच, तो केवळ मानवी मनात वावरतो. नरपशू- चिमेरा- या कल्पनेसारखीच देव ही कल्पना आहे. देव आणि नरपशू सारखेच काल्पनिक आहेत.
“भोळीभाबडी माणसे देवाच्या निर्मितीच्या माध्यमातून लबाड धूर्त लोकांकडून नागवली जातात. त्यांच्यावर जुलूम करण्याचेच ते साधन बनते. आणि या जुलुमाला संरक्षण मिळते ते त्या देवावर विश्वास ठेवणाऱ्या त्या नागवल्या जाणाऱ्या जनतेकडूनच. काही सुबुध्द लोकांकडून हे सत्य सांगून त्यांना मुक्त करण्याचे प्रयत्न झाले तर ही भोळी जनताच अशा प्रयत्नांचा पराभव करते.
तीनशे वर्षांपूर्वी हे सत्य स्पष्टपणे मांडणाऱ्या आणि त्यासाठी प्राण गमावणाऱ्या या विचारवंताच्या खांद्यावर आज आपण उभे आहोत. आणि साऱ्या जगाला त्या वाटेवर आणून सोडण्यासाठी सिध्द झालेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त किंवा कोणताही पुरस्कार न लाभताही विज्ञानशोधाचे काम करणाऱ्या अनेक नास्तिकांसोबत आपण आहोत.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात मात्र नास्तिकत्व हा काहीतरी लपूनछपून बाळगण्याचा विश्वास उरला नाही. ख्रिश्चॅनिटीमध्ये थोडे मोकळे वारे खेळू लागले. पॅरीसमधे ड हॉलबाख याने उघडपणे नास्तिकतेचा पुरस्कार केला. त्याच्या बैठकींमधे दिदेरो, रुसो, डेविड ह्यूम, ऍडॅम स्मिथ, बेंजामिन फ्रॅन्कलिन यासारखे अनेक विचारवंत हजेरी लावत. फ्रेंच क्रांतीच्या काळात नास्तिक विचाराला आदरपूर्वक अधिष्ठान मिळाले. ब्रिटनमधेही डेविड ह्यूमने इंग्लंडचा इतिहास लिहिला. देवाचा अजिबात उल्लेख नसलेला हा इतिहास आहे. पण फार आपत्ती ओढवू नयेत म्हणून ह्यूमने चमत्कारांची खिल्ली उडवली तरी ख्रिस्ती धर्मावर फार लेखणी उगारली नाही. असे सांभाळून रहाणारे नास्तिकही त्यांच्या कामाच्या झेपेमुळे महत्त्वाचे ठरले. अनेकदा समोर माजलेला मठ्ठ बैल असेल- त्यातून तो काळ्या अंधारातून आलेला असेल तर आडोशाला जावं लागतं हे आपणही लक्षात ठेवायला हवं. विचार करणारा टिकला तर विचार टिकेल हे या बदलत्या धर्मराजकीय काळात आपणही लक्षात ठेवायला हवं.
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस कवी शेली याने एक पत्रक काढले. नास्तिकतेची गरज विशद करणारे हे पत्रक वाटले म्हणून त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठातून उचलबांगडी झाली. पण याच एकोणिसाव्या शतकाने नास्तिक विचार मांडणाऱ्या अनेक विचारवंतांचा ठसा मिरवला. कार्ल मार्क्स हा त्यातील सर्वात मोठा ठसा उमटवणारा विचारवंत. धर्म हा गरीबांचे सहज शोषण करण्याचे साधन कसे बनतो याबद्दलचे त्याचे जगप्रसिध्द विवरण- धर्म ही अफूची गोळी आहे या वाक्यासह जगभरात वणव्यासारखं पसरलं. अनेकांना धर्माचे पर्यायाने देवसंकल्पनेचे जोखड भिरकावून देण्यासाठी बळ देत गेलं. फ्रिडरिश नित्शे याने तर देव मेला असल्याची धाडसी घोषणा केली. गंमत आहे. कार्ल मार्क्सने ज्या विचारसरणीला विरोध करणारा सिध्दांत मांडला त्या भांडवलवादाची मांडणी करणारा ऍडॅम स्मिथही देव नाकारत होता. साम्यवादी विचारसरणीचा विरोध करणारी आयन रॅण्डसुध्दा देवधर्म नाकारते. आय़न रॅण्डचा विरोध करणारा सॅम हॅरीस काय, नोआम चॉम्स्की काय तेही देवाची कल्पना कांडात काढतात.
विसाव्या शतकाने तथाकथित नास्तिक विचारांच्या हुकूमशहांचाही अतिरेक पाहिला. हिटलर, स्तालिन, लेनिन सारे नास्तिक होते असं म्हटलं जातं. पण हिटलरने कधीही ख्रिश्चॅनिटीला मोडून काढलं नाही. देशाचा सनातन धर्म म्हणून त्याने त्यांना वाव दिलाच. लेनिन-स्तालिन यांचा राजकीय डॉग्मा धार्मिक डॉग्माइतकाच जुलमी ठरला. विसाव्या शतकाच्या मध्यातच या सर्वांचा पराभव झाला. आणि नास्तिकत्वाचे खरे मुक्त, स्वतंत्र रूप व्यक्त होऊ लागले.
बर्ट्रांड रसेलसारखा नास्तिक विचारसरणीचा सामर्थ्यवान प्रतिभावंत तत्वज्ञ जगाने पाहिला.
त्यांचा एक लाडका किस्सा सांगते. तो आपण सगळेच आपल्याशी वरचेवर वाद घालायला येणाऱ्या भांडखोर आस्तिकांना थोडाफार बदल करून नक्की सुनावू शकतो.
बर्ट्रान्ड रसेलला त्याच्या नव्वदाव्या वाढदिवसाच्या पार्टीत एका परिचित स्त्रीने विचारलं होतं- “बर्टी, तू मेलास आणि तुला देवाच्या पुढ्यात नेलं गेलं आणि देवाने तुला विचारलं की बाबा रे, तू माझ्यावर विश्वास का नाही ठेवलास... तर मग? काय उत्तर देशील?
रसेलने उत्तर दिलेलं- “‘पुरावा नव्हता, देवा, पुरेसा पुरावा तू ठेवला नव्हतास’ असं सांगेन.”
बर्ट्रान्ड रसेलने आणखी एक सांगून ठेवलंय- खास आपल्यासाठी. तो म्हणतो-
The fundamental cause of trouble in the world today is that the stupid are cocksure, while the intelligent are full of doubt.
आजच्या जगातल्या त्रासाचं मूलभूत कारण एकच आहे- मठ्ठ लोकांना फार खात्री असते आपल्या मतांबद्दल. आणि बुध्दीमान लोक आपली मते सतत संशयपूर्वक पारखून पाहात रहातात.
एकविसाव्या शतकात- नास्तिकत्वाला खऱ्या अर्थाने आशा निर्माण झाली आहे. बर्ट्रांड रसेल सारखा बुध्दीमान तत्वज्ञ आणि रिचर्ड डॉकिन्ससारखा तत्वज्ञाप्रमाणेच मांडणी करू शकणारा उत्क्रांती-जीवशास्त्र अभ्यासक यांच्यामधली नास्तिक बुध्दीमंतांची मालिका आपल्याला पहायला मिळते आहे.
क्रेग वेन्टर या माझ्या लाडक्या वैज्ञानिकाचे नाव मला घेतलेच पाहिजे. क्रेग वेन्टर हा ह्यूमन जेनॉम प्रोजक्टमधला एक प्रमुख संशोधक. दुसरा होता फ्रॅन्सिस कॉलिन्स. वेन्टर नास्तिक तर कॉलिन्स आस्तिक. ह्यूमन जेनॉम प्रोजेक्टच्या पूर्ततेनंतर वेन्टरने स्वतःचे प्रयोग सुरू केले. कृत्रिम डिएनए बनवण्यात त्याने यश मिळवले. आता मानवी दीर्घायुष्य, वाढत्या लोकसंख्येसाठी मुबलक अन्नपुरवठा यासाठी तो काम करतो आहे. सागरी सूक्ष्मजीववैविध्याचे निरीक्षण आणि मांडणी हा त्याचा केवळ स्वतःचा असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. आपलीच बुध्दी वापरून जगायचं आहे हे कळल्यावर माणसाने कसं काम केलं पाहिजे याचा आदर्श आहे क्रेग वेन्टर. त्याला स्वतःला एडीएचडी नावाची डिसॉर्डर होती किंवा आहे. अटेन्शन डेफिसिट हायपरऍक्टविटी डिसॉर्डरची लक्षणं आपल्यात आहेत हे समजून घेऊन त्याने त्या डिसॉर्डरला जन्म देणारा जीन स्वतःतच शोधला. देवाच्या कल्पनेने नेस्तनाबूत न होणारी ही माणसेच आपल्याला अधिक समृध्द करणार आहेत.
त्याच वेळी आपल्या देशात काय चाललंय हे मी दाखवायला नको. आपण पाहातोच आहोत. आता वेळ आली आहे आपण भारतीय, आपण मराठी भाषक नास्तिक कसले योगदान देणार आहोत याचा विचार करायची. मला हे बोलण्याचा तसा काहीच हक्क नाही. हा हक्क गेली तीन वर्षे नास्तिक मेळावा आयोजित करण्याचे धैर्य आणि कौशल्य दाखवणाऱ्या तुम्हालाच आहे. २०१०मधे मी भारतीय नास्तिक हा ब्लॉग सुरू केला होता. नंतर त्याला काहीच प्रतिसाद नव्हता म्हणून वैतागून बंदच केला. २०१०मधे सुरुवात करतानाच मी लिहिले होते-
- आधुनिक भौतिक प्रगतीला मानवी आध्यात्मिक प्रगतीतले हीण ठरवून या देशात त्याच भौतिक प्रगतीचा आधार घेतघेत त्यामागील विज्ञानाला पराभूत करण्याचे धंदे चालतात. कितीही उच्च प्रतीच्या अध्यात्मातून, ईश्वराच्या शोधातून, भक्तीतून, तीर्थयात्रा-वाऱ्यांतून, हिमालयातील जपतपांतून आज आपण वापरतो त्यातील साध्यातले साधे अवजारही तयार झाले नसते. कुठल्याही देवाला अनवाणी जाऊन ना कुणाचा आजार बरा होतो ना कसलं यश येतं... पण तरीही असल्याच गोष्टींनी आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार होऊन आपले हातपाय पसरत नेले आहेत. तर्कशुध्द विचार करण्याचं वळण न लावणाऱ्या आपल्या शिक्षणपध्दतीतून बहुतांशी जे बौद्धिक विकलांग निघत रहातात त्यांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्याची हिंमतच होणार नाही.
एक उपाय मला सुचतो. छोटी सुरुवात असेल कदाचित पण अशी हिंमत असलेल्या नास्तिकांनी, विवेकनिष्ठांनी एकत्र आले पाहिजे. धर्मसंघटना असतात, पंथसंघटना असतात, देवळं-मशिदी-चर्च मंडळींची संस्थाने असतात, कुठल्याही फुटकळ महाराज-बाबा-बापू- माँ- अम्मांचे बिल्ले लावलेले ताफे असतात- आपल्यासारख्या लोकांचा एकतरी फोरम आहे? आपण आळशी आहोत की भित्रे- असा प्रश्न पडावा.
या जगात अनेक देशांतून, आपल्याच देशाच्या विज्ञानसंस्थांतूनही जग अंतर्बाह्य बदलून टाकणाऱ्या विषयांवरचे नवनवीन शोध लागत असताना, नवे शोध लागण्याची गती अनेकपटींनी वाढलेली असताना आपल्या भोवती जो देवधर्मोद्भव अपरंपार वैचारिक गोंधळ माजलेला दिसतो त्याबाबत आपण काय करणार आहोत. नुसतेच छद्मी हसणार?! खाजगीत टर उडवणार?! आणि मग आपण हे बदलू शकत नाही... अहो शतकानुशतकांच्या परंपरा आहेत या... कशा बदलणार... जाऊ द्या म्हणून गप्प बसणार?! विवेकनिष्ठेचा आंतराग्नि फुंकर घालताच फुलू शकतो.
कोणत्याही राजकीय तत्वप्रणालीचा झेंडा खांद्यावर न घेता हे करणे आवश्यक आहे.
भ्रामक कल्पनांना मोडीत काढण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलनाचीच नव्हे तर श्रध्दा निर्मूलनाची गरज आहे. विश्वासावर आधारित असलेला, पुराव्यावर आधारित नसलेला कोणताही दावा- अर्थात श्रध्दा म्हणजे अंधश्रध्दाच असते. हे मत मान्य असलेल्या सर्वांचे हे व्यासपीठ व्हावे.
केवळ लिहिण्यापुरतेच मर्यादित न रहाता आपण हे विषय हाती घेऊन तरूण मुलामुलींपर्यंत पोहोचले पाहिजे. मराठी भाषक मुलेमुली इंग्रजीतले विचार वाचायला अजूनही बिचकतात. भाषेमुळे ज्ञानही परके होते. म्हणून आपले विचार आपल्या भाषेतून. डॉकिन्स, रसेल, हिचिन्सन, डेनेट... साऱ्यांचे विचार आपल्या भाषेतून. लिहायचे. मांडायचे. पोहोचवायचे. हे एक कन्व्हर्जन आपल्याला करायलाच हवं.
आज ते इथे घडायला सुरुवात नव्हे तर सातत्यपूर्ण आय़ोजनाची सुरुवात झालेली पाहून मला खरेच खूप आनंद वाटतो. आपण नुसतेच लिहिले- केले काही नाही याची थोडी शरमही वाटते आहे.
आपल्या देशातील देवसंकल्पनेच्या आणि धर्माच्या चिकट शोषक जाळ्यात अडकलेल्या आपल्या लोकांना सोडवून, थोडेथोडे नास्तिक विचारांचे घास आपण भरवायला हवेत. त्यांना हे विश्व किती मोठं आहे हे समजू द्या.
त्यांच्या राम-कृष्ण-शंकर-विठ्ठल-दुर्गा-लक्ष्मी-हनुमान; ख्रिस्त-पोप-मदर-चमत्कारी संत; अल्ला-महंमद-पीर-काबा या उथळ विहिरींत कुदकण्यापेक्षा बाहेर भव्य असीम जग आहे... अब्जावधी वर्षांपूर्वीच्या ब्लॅकहोल्स टकरीचा हिशेब देणाऱ्या गुरुत्वीय लहरींचेही जग आहे हे त्यांना समजू द्या.
पेल ब्लू डॉटमधे कार्ल सेगन म्हणाला होता- कोणताही धर्म विज्ञानाकडे पाहून असं कधीच का म्हणत नाही की- अरे वा, हे तर आम्ही जे विचार केला होता त्यापेक्षाही छान आहे. आमच्या प्रेषितांनी सांगितलं त्यापेक्षा हे जग कितीतरी भव्य आहे, अधिक रम्य, असाधारण आहे... त्याऐवजी ते जणू म्हणतात छेछेछे- आमचा देव छोटासा आहे आणि आम्हाला तो तसाच रहायला हवं. हे कसं काय- मला कळत नाही. धर्म जुना असो वा नवा- जो धर्म विज्ञानाने स्पष्ट केलेले विश्वाचे भव्य रूप मान्य करून मांडेल त्या धर्माबद्दल स्वाभाविकपणे अधिक आदर, अधिक प्रेम वाटू शकेल नाही कां?
पण अशा विश्वाच्या भव्य रुपापासून सामान्य लोकांना वंचितच ठेवलं जातं. आपण हबलमधून दिसणाऱ्या असीम अवकाशाचा एक चिमूटभर अंश सुध्दा केवढा भव्य आहे ते कधीतरी या लोकांना सांगितलं पाहिजे.
विश्वातील प्रत्येक घडामोडीची कारणं भौतिकच असतात, या पृथ्वीवरच्या जगातल्या घडामोडींचा अर्थ लावायला विविध शास्त्रशाखा असतात... हे त्यांना समजू द्या.
विश्वाचा शोध घेण्याची लालसा बाळगणाऱ्या सर्वोच्च मानवी प्रज्ञेसंबंधी त्यांना काहीतरी समजू द्या-
नाहीतर ख्रिश्चन धर्मात जन्मलेली मुले दोन हजार वर्षांतल्या, मुस्लिम समाजातली मुले सातव्या शतकातल्या, हिंदूंची मुले तीन-चार हजार वर्षांतल्या... वगैरे- इतिहासापुरतीच मर्यादित होऊन रहातील. या पृथ्वीच्या साडेचारशे कोटी वर्षांच्या इतिहासाचा आवाका, या विश्वाच्या अजूनही निश्चित नसलेल्या गतकालाचा, अवकाश-काल अस्तित्वातच नव्हता तेव्हाच्या सिंग्युलॅरिटीच्याही आधीचा वेध घेण्याची माणसांची कुवत आहे हे त्यांना आपण नास्तिकच सांगू शकतो. संथ गतीनेही सही- पण आपण निदान आपल्या भोवतीच्या जगाला वैचारिक, बौध्दिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने पुढे नेऊ हे आपले योगदान असेल.
आभार.