Sunday, September 19, 2010

ब्लॉग बंद

बंद करणार आहे हा ब्लॉग. गणपतीच्या काळात बुध्दी या गोष्टीच्या संपूर्ण विटंबनेनंतर कशाबद्दल काही लिहावसं वाटत नाही...
त्यात भर पडली आहे त्या कोपनहेगनच्या मुलीची... तिला भारतातून सूचना करकरून संस्कृती जपण्याची कर्मकांडे करायला भाग पाडून वैताग आणणारे नातेवाईक आता तिच्या कोपनहेगनच्या घरातच पोहोचले आहेत. दोन-दोन तास देवासमोर बसणे हा त्यांच्या नैतिकतेचा परमोच्च बिंदू आहे. त्यावर विरोध व्यक्त केल्यानंतर आणि आणखी काही गोष्टी मनाविरुध्द झाल्यानंतर सासूबाईंच्या अंगात देवी आली... कोपनहेगनमध्ये.
देवदेव्या आणि तत्संबंधी कर्मकांडे आता आपल्या प्रादेशिक भाषांच्या माध्यमांतून एवढी बोकाळली आहेत की उगीच हे मिणमिण लिखाण काय करणार.
शिवाय बुध्दीजीवींची बुध्दीवंतांची भलीमोठी फौज आपल्याकडे आपल्या श्रध्दांबद्दल उदात्तीकरणाचीच भाषा बोलत असताना- आपल्याकडे स्टीफन हॉकिंग, रिचर्ड डॉकिन्स सबकी ऐशीतैशीच होणार.
तिथे मुग्धा कर्णिकचा काय पाड.
माझ्या भरवशाच्या नास्तिक मित्रांनीही यासंबंधी काहीही लिहित रहाण्याचे सौजन्य दाखवलेले नाही.
आता बस्स्स...

Wednesday, September 1, 2010

आज मन अधिकच विषण्ण झाले आहे.
दहीहंडीचा तमाशा बाहेर चालू आहे. गणपतीच्या सोंगाची तयारी सर्वत्र भांडवलाचा विध्वंस करतेच आहे. पण ते तर नेहमीचेच आहे.
आजच्या विशेष विषण्णतेचे कारण- आपल्या पंतप्रधानांनी तिरुपतीच्या मंदिरात जाऊन मनोभावे पूजाअर्चा केल्याची बातमी. आणि लोकसत्तेत नरेंद्र दाभोलकरांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांना लिहिलेले अनावृत्त पत्र.
लोक आपले आपापल्या भूमिका बजावत रहातात. अशोक चव्हाण स्वतः किती अंधश्रध्द आहेत हे काय दाभोलकरांना माहीत नसेल... तरीही त्यांना अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत पत्र लिहिण्याचे काय कारण. या निमित्ताने लोकांपर्यंत विषय पोहोचावा हा मर्यादित हेतू असेल कदाचित... आणि नुसता लेख छापण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना पत्र या स्वरुपात लिहिला तर त्याचे छपाईमूल्य वाढते हे ही कारण असू शकेल.
पण या देशात कायद्याने बदल करून अंधश्रध्दाविषयक परिस्थिती बदलेल ही अपेक्षा करणे हे विवेकनिष्ठाच्या हतबलतेचेच द्योतक आहे.
गंमत आहे. आपले अशोक चव्हाण, आपले विलासराव, आपले जयंत पाटील सारे सत्यसाईबाबांची वारी करत असतात. दाभोलकरांच्या अंनिसने या सत्यसाईबाबांच्या हातचलाखीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आपल्या कित्येक सत्रांमध्ये दाखवले आहे. या असल्या भक्तांकडून कसल्या विवेकनिष्ठ बदलांची अपेक्षा दाभोलकर करतात.
आज अनेकांनी विविध मराठी वृत्तपत्रांतून दहिहंडीच्या निमित्ताने जी हुल्लड चालते त्यावर, त्यानिमित्ताने धर्म, उत्सव साऱ्याबद्दलच लिहिले आहे. पण प्रत्येक मराठी वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर गोविंदाचे उदात्तीकरण झळकते आहे. हेडलाईन.
असल्या वृत्तपत्रांकडून कसल्या विवेकनिष्ठ बदलांची अपेक्षा आम्ही करावी.